‘वपु’ ( Vapu ) वसंत पुरुषोत्तम काळे
..हे माझे सर्वात आवडते लेखक.
आज ते हयात असते तर नक्कीच भेट घेतली असती.
त्यांच्यामुळे मला माणसातला माणूस शोधण्याचं तंत्र गवसलं अस मी म्हणेन,
ती सुरवात हि मी माझ्यापासूनच केली आहे म्हणा, मी हि माणूस शोधतोय.
स्वतःमधला दडलेला माणूस अन आयुष्याच्या ह्या प्रवास वाटेवर येणाऱ्या प्रत्येकामध्ये …तो शोध घेण्याचा प्रयत्न करतोय.
वपुंच्याच शब्दात सांगायचं तर …
माणूस नावाचा प्राणी अनेकदा भेटला.
नाना स्वरूपात भेटला. कधी खऱ्या स्वरूपात, कधी खोट्या ,
तर कधी संपूर्ण स्वरुपात, पुष्कळदा तो निसटला हि , ह्या माणसानं कधी मला रडवलं कधी हसवलं, कधी भुलवलं कधी थकवलं, कधी बैचेनं केलं. कधी अंतर्मुख ..
तरीही माझा शोध चालूच आहे अन चालूच राहणार ..माझा पेशन्स दांडगा आहे.
ह्याच श्रेय हि पुन्हा माणसांनाच आहे.
वाट पाहत राहण्याची माझी ताकद माणसांनीच वाढवली आहे.
साधारण ६-७ वर्षापूर्वी ठाण्यातल्या मराठी ग्रंथालयाचा मी सभासद झालो. अन तिथपासून खऱ्या अर्थाने वाचनाला सुरवात झाली. मित्रानी (जगदीश शेट्ये ) पाहिलं पुस्तकं हाती ठेवलं ते म्हणजे ‘ व्यक्ती अन वल्ली ‘ पु . ल देशपांडे ह्याचं.
तिथून पुढे मग वि. स. खांडेकर, प्रवीण दवणे ह्यांनी वेड लावलं.
प्रवीण दवणे सरांच्या व्याख्यानाला जावू लागलो. भारावल्या अवस्थेत त्यांच्या व्याख्यानातून बाहेर पडत होतो. एकदा असाच एका पुस्तक मध्ये त्यांनी पत्राविषयी लिहिलं होतं.
हल्ली ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पत्र सहसा कुणी लिहत नाही.
त्यातच माझ्या मित्राने त्यानां पत्र लिहिलं. त्याच उत्तर हि पंधरा एक दिवसातच त्यांच्या पत्रातून त्याला मिळालं .
ते पाहून वाचून त्याचा बोलण्यातून व्यक्त झालेला.
त्याचा तो ‘ओसंडता आनंद’ मी हि उपभोगत होतो .
तेंव्हा मी हि मनाशी ठरवलं. आपणही पत्र लिहायचं.
मी सुरवात केली. पेन हाती घेतला. अन भरभर मनातलं उतरून काढलं.
अन ते पोस्टाने न टाकता थेट त्यांच्या घरीच जावून दिलं.
त्यावेळेस ते मात्र घरी न्हवते.
त्यानंतर पंधरा एक दिवस ओलांडून गेले. त्याचं उत्तर काही आले नाही.
तेंव्हा मन थोडसं काळवंडल. तरीही अशा सुटली नाही.
येईल उत्तर एक ना एक दिवस ह्यातच गढून राहिलो.
आणि खरंच ..
एका महिन्यानंतर त्याचं सुवाच्च हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र हाती आलं.
दिलगिरी व्यक्त करत…थोड उशिराने ऊतर देतोय म्हणून …
तेंव्हाचा आनंद काही औरच होता.
इवढ्या मोठ्या लेखकाने माझ्या पत्राला उत्तर दिलं. ह्यातच किती ते सुख होतं. मी ते पत्र सर्वांना दाखवत सुटलो. आनंद कसा गगनी मावेनासा झाला होता.
त्यानंतर वपुंच एक पुस्तक हाती आलं आणि त्यांच्या लेखणीने मी अक्षरशा झपाटून गेलो.
अधाशासारखी एक एक पुस्तकं त्यांची वाचून काढली.
आपण सारे अर्जुन,
इन्टिमेट, का रे भुललासी ,
गुलमोहर,
गोष्ट हातातली होती,
घर हलवलेली माणसे,
चिअर्स, वन फॉर दि रोड,
तू भ्रमत आहासी वाया,
दुनिया तुला विसरेल,
दोस्त, पाणपोई , पार्टनर,
प्लेझर बाँक्स,
फॅन्टसी – एक प्रेयसी,
भुलभुलैय्या, महोत्सव, माझं माझ्यापाशी
मी माणूस शोधतोय, मोडेन पण वाकणार नाही
ही वाट एकटीची, वपुर्झा अशी एक एक पुस्तकांनी माझ्या मनावर छाप उमटवली .
त्याचा मनावर परिणाम झाला. माणसं निरखता येऊ लागली.
वपुंची वाक्य अन वाक्य मनावर कोरली गेली.
समाजात विशिष्ट उंची गाठे पर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.
जबाबदारी… ? जबाबदारी आणि ओझं, ह्यातला नेमका फरक सांगाल??
“ओझं म्हणजे खांद्यावर दिलेला बोजा. पण कधीकधी दहा-बारा हजारांचा एखादा
दागिना सांभाळायचा असतॊ. ते इतरांनाही माहित नसतं. त्याला जबाबदारी म्हणतात. आयुष्यापासून मघाशी मी सांगितलेली यादी..”
“प्रेम, मैत्री, संगोपण, शुश्रूषा ह्या सगळ्या जबाबदारया.
त्यांचं ओझं वाटलं की सहजता गेली.”
“ओझं हीदेखील जबाबदारी नसते का?”
“ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते.
ओझं बाळगणारयाला कदाचित मदतीचा हात मिळतो. तसं जबाबदारीचं नसतं.”“एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा. परीसराचं मौन म्हणजे एकांत आणि परिवारात असतानाही पोरकं वाटणं हे एकाकीपण.
एकाकी वाटलं तर मनसोक्त रडावं. अश्रु म्हणजे दुबळेपणा नाही.
पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात. आणि दिसेनासे होतात, तसा माणुसही हलका होतो. आकाशाजवळ पोहोचतो. असंच कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम ” तुका आकाशायेवढा ” असं लिहुन गेला असेल.”
अशी कितीतरी वाक्य आहेत. सांगायला गेलं तर हे पान हि अपूरं पडेल. त्यापेक्षा तुम्ही वाचाच …हाती पुस्तक घेऊन..
माझे सर्वात आवडते लेखक.
‘वपु’ ( Vapu ) वसंत पुरुषोत्तम काळे
– संकेत पाटेकर


' पुस्तकांच्या दुनियेत '
सफर करा तुमच्या पुस्तकांच्या दुनियेतली...
तुमचं आवडीचं पुस्तकं निवडा आणि आजच ऑर्डर करा.
Vapurza, Sakhi, Partner, Apan Sare Arjun, Dost (Set of 5 Books)
Click Here