क्षण घडवतात अन आपण घडत जातो..
आयुष्यात एक गोष्ट शिकलोय.
सुरवातीला वाटायचं हि जी नाती आहेत. चार भिंती पलीकडची.
जी मी माझ्या आयुष्याच्या प्रवासात नव्याने जुळवली आहेत. ती मला कायमची जपायची आहेत.
तुटू द्यायची नाही आहेत. भले कितीही वाईट प्रसंग येवोत.
मला ती जपायची आहेत बस्स.., अन त्यासाठी मी सतत प्रयत्नशील असायचो. भले कुणाकडून हि मनाला कितीही शाब्दिक घाव बसले तरीही, कुणी मान अपमान केला तरीही, कुणी कितीही दुर्लक्ष केल तरीही, कुणी बोलायचं थांबल तरीही..
मी माझ्या स्वभावानुसार पुन्हा बोलता व्हायचो. मागचं सार काही विसरून. कारण ते नातं हव असायचं मला. पण हळू हळू हे जाणवू लागलं कि नाही.
जुळलेल्या नात्यांपैकी काही नाती हि क्षणाचेच सोबती आहेत. काही नात्यांना आपलेपणाची किंमतच उरली नाही आहे. भगवंताने नेमून दिलेलं कार्य करून ते आपल्या ‘ आयुष्याच’ परीघ रेषा ओलांडून पुढे निघून जाण्याच्या तयारीत आहेत .
मग त्यांना रोखणारे आपण तरी कोण ? ते त्यांच्या जीवनाचे वाटकरी… काही अवधीसाठी ते आपल्या जीवनाच्या वाटेवर चालू लागतात. बोलू लागतात. अन मग निघून जातात.
त्यामुळे जे जाणारे आहेत ते जाणारच कसेही करून, बस ह्यापुढे आपण त्यांना रोखायचे नाही.
उगाच नातं नात करत बसायचं नाही. त्यातच गुंतून राहायचं नाही.
आपल्या परीने आपण चांगल वागावं. हसावं, बोलावं. जे जाणारे आहेत ते जातील. काही आपल्या बरोबरीने सोबत चालतील. किती अवधी साठी ते मात्र सांगता येत नाही.
कारण ज्याचा त्याचा जीवनमार्ग …
कोणतीही व्यक्ती कितीही अनुभवाने मोठी असली तरी अन त्यांच्या अनुभवाचे पाठ त्यांनी आपल्याला सांगितले तरीहि आपले अनुभव शेवटी आपल्यालाच अनुभवावे लागतात.
अन ते अनुभवी धडे त्या त्या वेळेनुसार आपल्याला परिस्थिती नुसार मिळत जातात.
क्षण घडवतात अन आपण घडत जातो..
असंच लिहिता लिहिता ..
– संकेत य पाटेकर